Sunday, March 13, 2011
वास्तु म्हणे तथास्तु ।
वास्तुशास्त्र व त्यानुसार गृहरचना या विषयी बराच प्रचार झाला आहे. वास्तुशास्त्राचे नियम घराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कसे पोषक आहेत याची माहिती आपणास सहज उपलब्ध होत आहे. ईशान्येस देवघर, पूर्वेस स्नानघर, आग्नेयेस स्वयंपाकघर,दक्षिणेस शयनकक्ष, नैऋत्येस हत्यारे, पश्चिमेस भोजनकक्ष, वायव्येस अन्नधान्य ठेवण्याची जागा, व उत्तरेस तिजोरी ठेवावी असे मार्गदर्शन करणारे श्लोक आपल्या वाचनात येतात. सध्याच्या 1BHK संस्कृतीत वास्तुशास्त्रातील नियमानुसार रचना करण्याचा प्रयत्न प्रत्येकास सहज साध्य होतोच असे नाही. आपल्या वास्तुत आपण वास्तुशांती हा विधी करतो . गृहस्वामी म्हणून आपण आदराने वास्तुदेवतेची स्थापना करतो. वास्तुदेवतेस वास्तोष्पति असेही नाव आहे. अथर्ववेदात रम्य गृहप्राप्तीसाठी सूक्त आहे. वास्तोष्पतिदेवते कडे अन्न, धन, बुद्धी आदींनी समृद्ध असा मी या नूतन गृहामध्ये प्रवेश करीत आहे. माझे समस्त कुटुंबिय येथे प्रेमाने व निर्भयपणे निवास करोत अशा कामनेनी सूक्ताची सुरवात असुन येथे बुभुक्षित अथवा हपापलेले कोणीहि नसोत. ही सर्वात महत्त्वाची प्रार्थना केली आहे. तसेच सूक्ताचा शेवट करताना हे गृहदेवते, तू येथे प्रसन्नपणे राहून सर्वसमृद्धी घडवून आण. तू येथून जाऊ नकोस. अशी प्रार्थना केली आहे. गृहदेवतेचे आशीर्वाद आपल्या प्रगतीस पोषक ठरतात. पण त्यासाठी घरातील वातावरण सतत मंगलमय राहील असा प्रयत्न करावा लागेल. घरात सतत यथाशक्ती धर्मकार्य करणे अगत्याचे ठरते. आपली गृहदेवता कशामुळे प्रसन्न राहील याची काळजी घेणे अगत्याचे आहे. घरात शांतता राखणे, नंदादीप सुरु ठेवणे,धूप घालणे , सर्वात महत्त्वाचे रोज सायंकाळी कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणणे तसेच शंखनाद करण्याचा प्रयत्न यशोवर्धक ठरेल. घरामध्ये अशुभ विचारांचे तरंगही उठू नयेत यासाठी दक्ष राहणे महत्त्वाचे आहे. वास्तुपुरुष सदैव तथास्तु हा वर देत असतो. तथास्तु म्हणजे तसे होवो. आपल्या शुभसंकल्पास जेव्हा गृहदेवतेचा आशीर्वाद मिळतो,तेव्हा अडथळ्यांची श्रृंखला भेदण्याचे अमोघ सामर्थ्य आपल्यात निर्माण होते. त्यामुळेच वडीलधारी माणसे घरात अशुभ बोलु नये असा आग्रह धरतात. वास्तुदेवता जागृत रहावी म्हणून ॐ चैतन्य वास्तुपुरुषाय नमः। हा मंत्र रोज म्हणणे हितावह ठरेल.
Subscribe to Posts [Atom]
Post a Comment